गुरव समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी आदिती तटकरे यांना निवेदन
Memorandum Submitted to Aditi Tatkare Regarding the Just Demands of the Gurav Community
इनाम वर्ग ३ जमीन, पूजा हक्क आणि आर्थिक विकास महामंडळाच्या मागण्यांकडे वेधले शासनाचे लक्ष
कोपरगाव/ रायगड : अखिल गुरव समाज संघटना, रायगड जिल्हाच्या वतीने राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा रायगडच्या माजी पालकमंत्री ना. आदिती तटकरे यांची भेट घेऊन गुरव समाजाच्या प्रलंबित व न्याय्य मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. समाजाच्या विविध जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
अखिल गुरव समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. आण्णासाहेब शिंदे यांच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री व प्रशासकीय प्रमुख यांना समाजाच्या मागण्यांचे निवेदन देण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून रायगड जिल्हा संघटनेने हा पुढाकार घेतला.
यावेळी मंदिरांमध्ये परंपरागत पूजा करणाऱ्या गुरव समाजाला त्यांचे हक्क मिळावेत, इनाम वर्ग ३ जमिनीबाबत न्याय्य निर्णय घ्यावा, तसेच कुळ कायदा कलम ८८(१)(अ) संदर्भात शासनाने नव्याने विचार करावा, अशी ठाम मागणी करण्यात आली. समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक सोयीसुविधा उपलब्ध करून देणे यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवरही भर देण्यात आला.
या प्रसंगी रायगड जिल्हाध्यक्ष समीर जगन्नाथ गुरव, जिल्हा महिला अध्यक्ष पूनम गणेश शिर्के, कर्जत तालुका अध्यक्ष सूरज गुरव, कार्याध्यक्ष जगदीश गुरव यांच्यासह जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील समाजबांधव, कार्यकर्ते आणि स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“समाजाची एकजूट हीच आमची खरी ताकद आहे. राष्ट्रीय अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा संघटना आपल्या हक्कांसाठी सातत्याने लढत राहील,” असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
गुरव समाजाच्या प्रश्नांवर शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन न्याय द्यावा, अशी अपेक्षा समाजबांधवांकडून व्यक्त होत आहे.