उभी पिके वादळी पावसाने भुईसपाट ; पंचनामे करा – आ. आशुतोष काळे
stormy rain

वृत्तवेध ऑनलाइन। 6 Sep 2020
By: Rajendra Salkar, 19.00
कोपरगाव : तालुक्याच्या पूर्व भागाला रविवारी (दि.६) रोजी दुपारी ३.०० ते ५.०० या वेळेत आलेल्या वादळी वारा व मुसळधार पावसामुळे उभी पिके भुईसपाट झाल्याने मोठे नुकसान झाले असून तातडीने पंचनामे करावे असे आदेश आमदार आशुतोष काळे यांनी तहसीलदार योगेश चंद्रे व तालुका कृषी अधिकाऱ्याला दिले आहेत.
कोपरगाव तालुक्यातील करंजी, पढेगाव, कासली, शिरसगाव, तिळवणी, तळेगाव मळे, दहेगाव, लौकी, धोत्रे, खोपडी, भोजडे आदी गावांना वादळी वाऱ्याचा व मुसळधार पावसाचा मोठा तडाखा बसला असून शेतातील उभी पिके ऊस, मका, कपाशी, कांदा रोप, बाजरी, तूर आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होवून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. रविवारी सुमारे दोन तास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने शेतीची दाणादाण उडवून दिली. या वाऱ्याचा व पावसाचा मुख्यत: फटका काढणीला आलेल्या बाजरी, मका, तूर, कपाशी या पिकांना बसला असून शेतातील हि पिके जमीन दस्त झाले आहे
कोरोना संकटात पावसाने साथ दिल्यामुळे सर्वच पिके जोमात होती. मात्र झालेल्या वादळी पावसाने पूर्व भागातील शेतकऱ्यांचे स्वप्नच उध्वस्त करून टाकले आहे. या वादळी पावसामुळे मोठ-मोठे झाडे उन्मळून पडली असली तरी सुदैवाने जीवित्तहानी झालेली नाही. शेतीच्या झालेल्या नुकसानीची माहिती मुंबई येथे अधिवेशनासाठी गेलेल्या आ. आशुतोष काळे यांना समजताच भ्रमणध्वनीवरून त्यांनी तहसीलदार योगेश चंद्रे, तालुका कृषी अधिकारी यांना झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. काही दिवसांपूर्वी धोत्रे परिसरात ढगफुटी होवून मोठे नुकसान झाले होते. या जखमा ताज्या असतांनाच आज पुन्हा धोत्रे व परिसराला वादळी पावसाने झोडपल्यामुळे शेतकरी कोलमडून पडला आहे. कोपरगाव तालुक्यात झालेल्या नुकसानीबाबत आपण मदत, पुनवर्सन खात्याच्या मंत्र्याशी संपर्क करून झालेल्या नुकसानीची माहिती देवून मदत मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू असे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.





