अतिवृष्टी : पिकांचे पंचनामे करा, त्वरीत भरपाई दया – सौ स्नेहलता कोल्हे

जिल्हाधिकार्यांकडे मागणी
वृत्तवेध ऑनलाईन 25 July 2020
By:Rajendra Salkar, 16.44
कोपरगाव :कोपरगाव मतदारसंघात सलग दोन दिवस मोठया प्रमाणात झालेल्या पाऊसामुळे अनेक गावांना अतिवृष्टीचा फटका बसला, शेतक-यांच्या उभ्या पिकाचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले, या नुकसानीचे पंचनामे करून त्वरीत भरपाई दयावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव,माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे.
कोपरगाव विधानसभा मतदार संघात सलग दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळला, या पाऊसामुळे शेतक-यांचे नुकसान झाले, शेतामध्ये पाणी साठल्याने तळयांचे स्वरूप आले, त्यामुळे उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले, डांळीबांच्या बागा, कांदा,सोयाबीन, मका, ज्वारी आदी पिकांचा समावेश आहे. वारंवार येणारी नौसर्गिक आपत्ती बरोबरच सध्याच्या कोरोना प्रादुर्भावाच्या परिस्थितीमुळे शेतक-यांपुढे मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. लॉकडाऊनमुळे पिकविलेल्या मालाला बाजारभावही मिळत नसल्याने शेतक-यांना विवंचनेत आहे. अशा प्रतिकुल परिस्थितीवर मात करून पिके उभी केली. परंतु अतिवृष्टीमुळे उभ्या पिकेही हातातून गेल्याने शेतक-यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. मतदार संघातील पोहगाव, सोनेवाडी, मढी बु., चांदेकसारे, देर्डे चांदवड, देर्डे को-हाळे, हंडेवाडी, कारवाडी, वेळापूर, सुरेगाव, कोळपेवाडी, कोळगाव थडी, माहेगाव देशमुख, कुंभारी, हिंगणी, रांजणगांव देशमुख, अंजनापुर,डाऊच, धारणगाव आदी गावांमध्ये मोठया प्रमाणात नुकसान पोहचले आहे, शेतीपिकाबरोबरच घरात पाणी घुसून पडझड झाली तर विहीरींचेही नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी सौ कोल्हे यांनी केली.





