आमच्या विकासाच्या भूमिकेला जनतेचा अफाट प्रतिसाद, विजय निश्चित – पराग संधान

आमच्या विकासाच्या भूमिकेला जनतेचा अफाट प्रतिसाद, विजय निश्चित – पराग संधान

Our development agenda has received an overwhelming response from the public; victory is certain – Parag Sandhan

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनFir19 Dec 21.20Pm.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव : कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षांच्या उमेदवारांना प्रचारादरम्यान नागरिकांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून हा जनतेचा कौल आमच्या विजयाची स्पष्ट साक्ष देणारा आहे, असा विश्वास भाजपा मित्र पक्षांचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान यांनी व्यक्त केला आहे.

शहरातील प्रत्येक प्रभागात प्रचारासाठी गेल्यानंतर नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मतदारांनी आम्हाला केवळ उमेदवार म्हणून नव्हे, तर आपल्या हक्काचे, विश्वासार्ह आणि विकासाभिमुख प्रतिनिधी म्हणून स्वीकारले आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत सर्व उमेदवारांना मतरूपी आशीर्वाद मिळतील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विरोधकांकडे कोणताही ठोस मुद्दा नसल्याने ते संभ्रमात सापडले असून, निवडणूक कोणत्या मुद्द्यावर लढवायची याचाच त्यांना अंदाज आला नाही. मेणबत्ती आणि अगरबत्तीपुरते मर्यादित राजकारण करत असताना, रस्त्यांची दुरवस्था, धूळ, पाणीपुरवठा, स्वच्छता यांसारखे मूलभूत प्रश्न विरोधकांना साधे आठवलेदेखील नाहीत, ही दुर्दैवी बाब असल्याचे पराग संधान यांनी सांगितले.

शहरात गेल्या काही वर्षांत भ्रष्टाचार बोकाळला असून आता पारदर्शक, जबाबदार आणि जनतेला उत्तरदायी प्रशासनाची नितांत गरज आहे. याच भूमिकेतून आम्ही नागरिकांसमोर जाहीर केलेला ‘विश्वासनामा’ जनतेने आनंदाने स्वीकारला आहे. या विश्वासनाम्यामध्ये सामान्य नागरिकांच्या दैनंदिन समस्या, शहराचा समतोल विकास आणि स्वच्छ, सक्षम प्रशासनाचा स्पष्ट आराखडा मांडण्यात आला आहे.

या सकारात्मक भूमिकेमुळे हजारो युवकांनी स्वयंस्फूर्तपणे पक्षात प्रवेश करत आम्हाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच महिला भगिनींना विश्वास वाटावा अशा ठोस, सुरक्षितता व सक्षमीकरणाच्या संकल्पना आम्ही मांडल्याने युवक,जेष्ठ आणि महिलांकडूनही उमेदवारांना मोठा प्रतिसाद मिळत आहे.

जनतेचा हा वाढता पाठिंबा पाहता कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत भाजपा व मित्र पक्षांचा विजय निश्चित असून शहराच्या सर्वांगीण विकासाचा नवा अध्याय सुरू होईल, असा विश्वास पराग संधान यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page