भोंदू वसुली एजंट जनतेसमोर उघडे”;
कोल्हे गटाचा कदमांवर पलटवार
Fraudulent Recovery Agents Exposed Before the Public”;Kolhe Faction Launches Counter-attack on Kadam
आम्हाला अध्यात्म शिकू नका कलविंदरसिंग दडीयाल यांचा इशारा आरोप प्रत्यारोप आणि कोपरगाव चे राजकारण तापले
Rajendara C. Salkar, Portal, वृत्तवेध ऑनलाईन,Apr 19 Sun 18.30 Am.By सालकर राजेंद्र
कोपरगाव :सुभद्रानगर येथील स्वामी समर्थ मंदिर परिसरातील भूमिपूजन वादावरून रंगलेल्या आरोप-प्रत्यारोपांना आता अधिक धार चढली असून, नगरसेवक जनार्दन कदम यांच्या टीकेला कोल्हे गटाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. “खोटे बोलून आरोप करणारे भोंदू वसुली एजंट जनतेने ओळखले आहेत. त्यांनी आम्हाला अध्यात्म व शांततेचे धडे देऊ नयेत,” असा रोखठोक इशारा कलविंदरसिंग दडीयाल यांनी दिला आहे.
दडीयाल यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले की, काही जण खोटे आरोप करून जनतेची दिशाभूल करत असून, स्वतःचे राजकीय स्वार्थ साधण्यासाठी धार्मिक स्थळांचाही वापर करत आहेत. “आमच्या नेतृत्वावर खोटे आरोप करून स्वतःची पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र जनतेला आता सत्य समजू लागले आहे,” असा दावा त्यांनी केला.
धार्मिक व पवित्र ठिकाणी मुद्दाम गोंधळ निर्माण करण्यासाठी विरोधकांकडून स्वतःचे लोक पुढे करून वातावरण बिघडवले जाते, ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. “खोट्या अफवा पसरवणाऱ्यांचा दुटप्पी चेहरा लवकरच पुराव्यानिशी उघड करू,” असा इशाराही दडीयाल यांनी दिला.
“विरोधकांच्या खोट्या भूमिकांना विरोध करणे म्हणजे दमबाजी नव्हे. उलट आमच्या नेत्यांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे काम केले,” असे सांगत त्यांनी “उलटा चोर कोतवाल को दाटे” अशा शब्दांत विरोधकांवर टीका केली. पुढे पातळी सोडून राजकारण केल्यास त्यांचा खरा चेहरा जनतेसमोर येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
दडीयाल यांनी पुढे म्हटले की, काही जण प्रथम धार्मिक ठिकाणी गोंधळ घालतात आणि नंतर सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात. अर्धसत्य आणि चुकीची माहिती पसरवून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत असला, तरी सुज्ञ नागरिक आता अशा भुलथापांना बळी पडणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, स्वामी समर्थ सभामंडपाच्या कामाला विरोध दर्शविल्याचा आरोप काळे गटावर करत, धार्मिक स्थळांच्या विकासकामांमध्ये अडथळे आणणे चुकीचे असल्याचे दडीयाल यांनी स्पष्ट केले. “जनतेने सत्य परिस्थिती ओळखून अशा भोंदू एजंटना वेळीच आवर घालावा,” असे आवाहन त्यांनी केले.
या सर्व घडामोडींमुळे कोपरगावातील राजकीय वातावरण आणखी चिघळले असून, आरोप-प्रत्यारोपांचा हा वाद पुढे कोणते वळण घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Post Views:
5





