कोपरगाव: महिला सबलीकरणाला ठोस दिशा देणारा निर्णय यंदाच्या अर्थसंकल्पात घेण्यात आला असून महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीसाठी स्वतंत्र मॉल्स उभारण्याचा धोरणात्मक निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे, असे मत भाजपा नेत्या व माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांनी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या या दूरदृष्टीपूर्ण निर्णयाचे त्यांनी कौतुक केले.
ग्रामीण भागातील महिला स्वयंसहाय्यता बचतगट कृषी, दुग्धव्यवसाय, गृहउद्योग, सेंद्रिय उत्पादने, कुक्कुटपालन आदी क्षेत्रांतून आर्थिक प्रवाहाला गती देत आहेत. मात्र त्यांच्या उत्पादनांना मोठ्या बाजारपेठेची गरज होती. ती उणीव भरून काढणारा हा अर्थसंकल्प असल्याचे कोल्हे यांनी नमूद केले. राज्यस्तरावर विपणनासाठी स्वतंत्र सुविधा निर्माण करण्याची मागणी आपण सातत्याने करत होतो, ती आता साकार होत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुलींसाठी जिल्हानिहाय वसतिगृहे, लखपती दीदी योजनेचे व्याप्तीकरण आणि पर्यटन मार्गदर्शक प्रशिक्षण यांसारख्या तरतुदींमुळे महिला आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होतील. आत्मनिर्भर भारताच्या दिशेने हा अर्थसंकल्प मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास सौ. स्नेहलता कोल्हे यांनी व्यक्त केला.