आदिवासी बांधवांना योजनांचा लाभ मिळावा – आ. आशुतोष काळे
Tribal brothers benefit of the scheme
वृत्तवेध ऑनलाईन। 12 Aug 2020,
By: Rajendra Salkar, 15:45
कोपरगाव : कोपरगाव विधानसभा मतदार संघात आदिवासी बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणात असून त्याप्रमाणात मिळणारा निधी हा अत्यल्प आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांना शासनाकडून मिळणाऱ्या योजनांचा लाभ मिळत नाही. त्यासाठी आदिवासी बांधवांच्या योजनांसाठी देण्यात येणाऱ्या निधीत वाढ करून आदिवासी बांधवांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आदिवासी बांधवांना जास्तीत जास्त लाभ मिळावा अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी आदिवासी विकास नासिक विभागाचे आयुक्त किरण कुलकर्णी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
आ आशुतोष काळे यांनी आदिवासी बांधवांच्या विविध विकासाच्या योजनांना निधी कमी पडत असल्यामुळे नासिक येथे जावून आयुक्त किरण कुलकर्णी यांची भेट घेवून त्यांच्या समवेत कमी प्रमाणात मिळत असलेल्या निधीमुळे विकासकामे करतांना मर्यादा येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. कोपरगाव विधानसभा मतदार संघात आदिवासी बांधवांची संख्या मोठी असून हा भाग ओ.टी.एस.पी. क्षेत्रात मोडतो. त्यामुळे आदिवासी लोकसंख्येच्या प्रमाणात या भागासाठी निधी उपलब्ध होत नाही. आदिवासी बांधवांसाठी घरकुल, ठक्कर बाप्पा आदिवासी योजना, स्वयं रोजगार अर्थ सहाय्य योजना, मेडिकल, इंजिनिअरींग, एम.एस.सी. आय.टी. आदी आदिवासी विद्यार्थी प्रशिक्षण योजना, व्यक्तिगत लाभाच्या योजना, किराणा दुकान अर्थ सहाय्य योजना अशा अनेक योजना आहेत. मात्र निधी कमी पडत असल्यामुळे आदिवासी बांधवांना या योजनांचा लाभ मिळत नसल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी आयुक्त किरण कुलकर्णी यांना सांगितले. आदिवासी बांधवांना सर्वच योजनांचा जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी निधी वाढवून मिळावा याबाबत आपण शासन दरबारी प्रस्ताव सादर करावा अशी मागणी आ आशुतोष काळे यांनी चर्चेदरम्यान केली. आयुक्त किरण कुलकर्णी यांनी आ आशुतोष काळे यांच्या निधी मागणीच्या प्रस्तावास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.





