प्रतिक्षा संपली : १ तारखेला उजव्या व डाव्या कालव्यांना आवर्तन सुटणार – आ. आशुतोष काळे

प्रतिक्षा संपली : १ तारखेला उजव्या व डाव्या कालव्यांना आवर्तन सुटणार – आ. आशुतोष काळे

The wait is over: On the 1st, the right and left canals will be rotated – b. Ashutosh Kale

RajendraSalkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 26 Dec 2020, 18:00:00

  कोपरगाव : कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे सिंचनासाठी एक रब्बी व दोन उन्हाळी आवर्तन देण्याचे पाटबंधारे विभागाने नियोजन केले आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असला तरी गोदावरी कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील असंख्य शेतकऱ्यांच्या आवर्तनाची मागणी लक्षात घेवून पाटबंधारे विभागाला केलेल्या सूचनेनुसार गोदावरी उजव्या व डाव्या कालव्यांना १ जानेवारी रोजी पहिले आवर्तन सोडणार असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.

गोदावरी कालव्यांना एक रब्बी व दोन उन्हाळी आवर्तन मिळणार आहे. मागील पाच वर्षात लाभधारक शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेने आवर्तनाचा लाभ मिळत नव्हता. अनेक लाभधारक शेतकरी आवर्तनापासून वंचित राहत होते. मुख्य वितरिका दुरुस्ती रखडल्या होत्या.आवर्तन सुरु असतांना शेतकऱ्यांना येणाऱ्या अशा अनेक अडचणींकडे आमदार आशुतोष काळे यांनी पाच वर्षानंतर प्रथमच कोपरगाव येथे झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत अन्न नागरी पुरवठा मंत्री तथा नासिकचे पालकमंत्री ना. छगनराव भुजबळ यांचे लक्ष वेधले होते. आमदार आशुतोष काळे यांनी मांडलेल्या अडचणींची दखल घेवून १ तारखेला आवर्तन सोडण्यापूर्वी आवश्यकतेनुसार मुख्य वितरिका देखील दुरुस्त करण्याचे आदेश पाटबंधारे विभागाच्या सबंधित अधिकाऱ्यांना देण्यात  आले आहेत.       सात नंबर पाणी मागणी अर्ज दाखल केलेल्या सर्वच शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळणार आहे. मागील आवर्तना प्रमाणे या आवर्तनात देखील लाभधारक शेतकरी आवर्तनापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना आमदार आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाला दिल्या आहेत. १ जानेवारी रोजी सोडण्यात येणाऱ्या आवर्तनातून प्रथम बिगरसिंचन अर्थात पाणी पुरवठा करणारे साठवण तलाव प्रथम भरून घेतले जाणार असून १० तारखेपासून शेतकऱ्यांना सिचनासाठी पाणी देण्यात येणार आहे. कोरोना विषाणूचे संकट टळलेले नाही.अजूनही कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे आवर्तन सुरु असतांना शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेवून प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून पाटबंधारे विभागाला सहकार्य करून आवर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे. दरम्यान रब्बी पिकांना सिंचनासाठी वेळेवर आवर्तन मिळणार असल्यामुळे गोदावरी कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page