साईभक्तांच्या अडचणी दूर करून विमानसेवा सुरळीत करा – आ. आशुतोष काळे
Smooth the airline by removing the problems of Sai devotees – Ashutosh Kale
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Wed 20 Oct 2021,17:20Pm.
कोपरगाव : साई मंदिर दर्शनासाठी खुले झाले असून दिवाळी सण, त्यांनतर नाताळ व नवीन वर्ष लक्षात घेता जगभरातून साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीमध्ये विमानाने येणाऱ्या भाविकांची संख्या वाढणार आहे. याची दखल घेऊन अडचणी तातडीने दूर करून विमानसेवा सुरळीत करावी अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी विमान प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहे.

माजी आमदार अशोकराव काळे यांच्या कार्यकाळात जगभरातील साई भक्तांना शिर्डी येथे येण्यासाठी कोपरगाव तालुक्यातील काकडी विमानतळाची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे काकडीसह पंचक्रोशीच्या गावातील बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या मात्र विमान प्राधिकरणाकडून योग्य त्या उपाययोजना केल्या जात नसल्यामुळे काकडी विमानतळ समस्येच्या गर्तेत अडकले आहे. त्याबाबत आ.आशुतोष काळे यांनी विमान प्राधिकरण विविध विमान कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसमवेत काकडी विमानतळ येथे बैठक घेतली. विमानसेवा ठप्प झाल्यानंतर त्याचा परिणाम विमानतळ परिसरातील गावांमध्ये होतो याची जाणीव ठेवा. विमानतळावरून पूर्णक्षमतेने दिवसा व रात्री विमानसेवा सुरळीतपणे सुरु राहील याची काळजी घ्या. लॉकडाऊनच्या काळात या विमान सेवेतील अडचणी का सोडविल्या नाही? यावरून अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. केंद्र शासनाच्या सबंधित अडचणी देखील सोडविण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली. कमी दृश्यमानतेमुळे विमान उतरण्यात येत असलेल्या तांत्रिक अडचणी दूर करा. नोकरीच्या संधी उपलब्ध होतील त्यावेळी स्थानिकांना प्राधान्य देवून कंत्राटी कामगारांना किमान वेतन कायद्याप्रमाणे कामगारांना वेतन द्या. मल्हारवाडी ग्रामस्थांसाठी देखील पिण्याच्या पाण्याची टाकी बांधून द्या. तसेच कराराप्रमाणे जिल्हा परिषद शाळा व न्यू इंग्लिश स्कूलचे रखडलेले काम पूर्ण करून कार्गो टर्मिनल आराखडा तातडीने तयार करा अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी उपस्थित विमान प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
या बैठकीसाठी विमानतळ संचालक सुशीलकुमार श्रीवास्तव, विमानतळ टर्मिनल मॅनेजर एस.मुरली कृष्ण, विमानतळ अभियंता कौस्तुभ ससाणे तसेच विमानतळ प्राधिकरणाचे सर्व अधिकारी तसेच इंडिगो एअरलाईन्सचे चौरे, स्पाइस जेट एअरलाईन्सचे स्टेशन मास्तर अशोक मौर्या, राजपथ इंफ्राचे विपुल बावचर आदी अधिकारी उपस्थित होते.
चौकट :- कोरोनाला हरवून परतलेल्या आ.आशुतोष काळे यांचे काकडी गावात आगमन होताच ग्रामस्थांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करून त्यांचे स्वागत केले..





