शिर्डी विमानतळाला टाळे ठोकण्याचा इशारा देताच.. प्रशासन नरमले
As soon as the Shirdi airport was signaled to be locked .. the administration softened
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu18 Nov.2021,20.55Pm.
कोपरगाव: शिर्डी विमानतळाकडे काकडी ग्रामपंचायतीच्या चार वर्षाच्या करांची ४ कोटी २ लाख रुपयांची थकबाकी आहे. ग्रामपंचायतीने विमान प्रशासनाला दिली नोटीस दिली मात्र तरीही न जुमानणाऱ्या विमानतळ प्रशासनाला जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी ग्रामस्थांच्या वतीने थकबाकी भरा अन्यथा टाळे ठोकू असा पंधरा दिवसाचा अल्टिमेटम देताच प्रशासन नरमले असून महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे अप्पर जिल्हाधिकारी दीपक नलावडे यांनी लेखी आश्वासन दिले आहे.
शिर्डीचा हा विमानतळ कोपरगाव तालुक्यातील काकडी या ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतो. नियमानुसार विमानतळाला ग्रामपंचायतीचे कर भरणे आवश्यक आहे. त्यानुसार ग्रामपंचायतीने २०१६-१७ पासून बिले दिली आहेत. मात्र, विमानतळाकडून पैसे भरण्यात आले नाही. त्याची थकबाकी आता ४ कोटी २ लाख ४८ हजार रूपये झाली आहे. त्यामुळे काकडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पूर्वा रविंद्र गुंजाळ व ग्रामपंचायत सदस्यांचे शिष्टमंडळाने शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापनाकडे अनेकदा पाठपुरावा केला. विमानतळ कंपनीसह सरकारकडेही पाठपुरावा सुरू होता. तरीही ही रक्कम न मिळाल्याने ग्रामपंचायत अंतर्गत रस्ते पाणी आरोग्य वीज, शाळा अन्य विविध विकासाच्या योजना राबवितांना अडचणी येत आहेत. औरंगाबाद येथील विधीज्ञ राहुल टेमक यांच्यामार्फत ११ ऑक्टोंबर रोजी विमानतळ प्रशासनाला नोटीस बजावली होती. शेवटी नाइलाज म्हणून कोल्हे यांनी प्रसारमाध्यमापुढे भूमिका मांडतांना काकडी शिर्डी विमानतळ व्यवस्थापनास पंधरा दिवसांची मुदत देत रक्कम न मिळाल्यास टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता. त्यावर महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे अप्पर जिल्हाधिकारी दीपक नलावडे यांनी काकडी ग्रामपंचायत थकीत कर रक्कम मागणीचा प्रस्ताव तयार केला. तो सरकारला सादर करण्यात आला आहे. त्यासोबतच ग्रामपंचायतीला पत्र देऊन थकबाकी वसुलीसंबंधी तूर्त कोणतीही कारवाई करू नये, अशी विनंती केली आहे. यासंबंधी कोल्हे म्हणाले, आता विमानतळ कंपनीने काकडी ग्रामपंचायतीचे २०२२ पर्यंतची थकीत कर रक्कम ५ कोटी ९ लाख ३८ हजार ९१६ रूपये तातडीने भरावी. त्याचा उपयोग काकडी मल्हारवाडी ग्रामपंचायत अंतर्गत विकास कामांना होणार आहे. ही रक्कम लवकरात लवकर मिळाली नाही तर पुन्हा न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्यात येतील, असा इशाराही कोल्हे यांनी दिला आहे.





